चिपळूण : चिपळूण शहर व सावर्डे येथून पैशांच्या वादातून दोन तरुणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे चिपळूण तालुका हादरून गेला असून याप्रकरणी सहाजणांविरोधात चिपळूण व सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथे 3 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास 20 वर्षीय सिद्धेश मारुती शिंगरे याचे अपहरण झाल्याची फिर्याद त्याची आई मेघा मारुती शिंगरे (बिडलीनगर, महाडिक कॉम्प्लेक्स, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग, मूळ रा. कोकीसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार संशयित आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड व विनोद टक्के (सर्व रा. मुंबई) यांनी संगनमताने संबंधित तरुणाचे अपहरण केले. सिद्धेश शिंगरे व संशयित आरोपी यांच्या गाडीचा सावर्डे बाजारपेठ येथे अपघात झाला होता. या अपघातात नुकसान झालेल्या गाडीची नुकसान भरपाईची रक्कम मिळविण्यासाठी संबंधित संशयित आरोपीनी सिद्धेश याला जबरदस्तीने पळवून नेले. दुसरी घटना चिपळूण शहरातील काविळतळी येथे 8 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी प्रकाश मार्तंडराव पवार (वय 70, रा. काविळतळी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश पवार व त्यांचा मुलगा शुभम (वय 29) यांचे संशयित आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकुंडे (दोघेही रा. काळज, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) याच्याशी पैशांची देणे-घेणे व्यवहार झालेला आहे.