सांगली ः उसाचा गळीत हंगाम संपून दीड ते दोन महिने उलटून गेले, मात्र अद्यापही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे 180 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. ही रक्कम पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा प्रत्येक कारखान्याच्या विरोधात मालमत्ता जप्तीचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत बुधवारी पत्रकार बैठकीत दिला.
ते म्हणाले, ऊस गाळप झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असतानाही कारखानदारांकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी एफआरपीचे तुकडे केल्याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले होते. व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.
सांगलीला कोण वाली आहे की नाही?
अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यात बेदाणा, द्राक्ष तसेच रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टी व अपुरा सूर्यप्रकाश यामुळे द्राक्षाच्या वाढीवर परिणाम झाला, तर गारपिटीनेही मोठे नुकसान झाले. सरकारने मदतीची घोषणा केली असली, तरी जिल्ह्यात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामेही सुरू केले नाहीत. त्यामुळे सांगलीला कोण वाली आहे की नाही?, असा संतप्त सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.