ईश्वरपूर : राजारामबापू साखर कारखान्याने गळीत हंगाम सन 2025-26 मध्ये कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास येणार्या उसास प्रतिटन रुपये 3500 दर निश्चित केलेला आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला ऊस आपल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी केले आहे.
गेला गळीत हंगाम हा उसाच्या टंचाईमुळे 100 दिवसाच्या आत संपला. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार येत्या काही दिवसात साखरेचा किमान विक्रीचा दर वाढविणार, अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात इथेनॉलचे दर वाढविले नाहीत. येत्या काही दिवसात इथेनॉलचे दरही एफआरपीच्या प्रमाणात वाढविणे अपेक्षित आहे. याशिवाय साखरेचा उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त राहू शकतो, असे गृहीत धरून आपण रुपये 3500 प्रति टन दर निश्चित केलेला आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने गेल्या 50-55 वर्षांच्या कारकीर्दीत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम जपली आहे. नेहमी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांच्या हिताला सातत्याने प्राधान्य दिले आहे. कारखान्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. आम्ही गेल्या काही वर्षांत ऊस उत्पादक शेतकर्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवित आहोत. आम्ही क्षारपड जमीन सुधारणा, ठिबक सिंचन, कुसुमताई प्रोत्साहन योजना आदी अनेक शेतकर्यांच्या हिताच्या योजना राबवित आहोत. या योजनांना ऊस उत्पादक शेतकर्यांचाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.