मारुती पाटील
ईश्वरपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली अनेक महिने बंद आहे. मार्चअखेर कामाची मुदत संपत असताना पेठनाका ते कागलपर्यंतचे केवळ 50 टक्केच काम पूर्ण झाले आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने गाशा गुंडाळला असल्याची चर्चा आहे. रुंदीकरणाचे काम रखडल्याने या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
सप्टेंबर 2022 पासून पुणे -बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरण कामास सुरुवात झाली आहे. 30 मार्च 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका आणि पेठनाका ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, अशा दोन टप्प्यात काम केले जात आहे. दोन्ही टप्प्याच्या मुख्य ठेकेदार कंपन्यांनी उपठेकेदार नेमले आहेत. मुख्य ठेकेदार आणि उपठेकेदार कंपन्यांत समन्वय नसल्याने काम कासवगतीने सुरू आहे. सातारा ते पेठ नाक्यापर्यंतचे काम गतीने सुरू असले तरी पेठनाका ते कागलपर्यंतचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. मशिनरी जागीच थांबून आहे.
चार वर्षात 50 टक्केच काम...
गेल्या चार वर्षात या मार्गाचे केवळ 50 टक्केच काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील उड्डाणपूल, सेवा रस्ते, नदीवरील पूल, रस्त्याकडील नाले ही कामे ठप्पच आहेत. कामगार, मशिनरी चालकास वेळच्या वेळी पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. ठेकेदार कंपनीच निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत त्याविरोधात केंद्र सरकारकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहवाल पाठवला असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. आता केंद्र सरकार काय निर्णय घेते त्यावर या कामाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
व्यावसायिक संकटात.. प्रवाशांचे हाल..
महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने महामार्गालगतच्या व्यावसायिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय या रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणी निवाऱ्याची सोय नसल्याने प्रवाशांना भर उन्हात रस्त्यावरच बसची वाट पाहत थांबावे लागत आहे.
दृष्टीक्षेपातील रस्ता....
पेठनाका ते कागल अंतर ः 61 किलोमीटर, मंजूर निधी ः 1025 कोटी, कामाला सुरुवात ः सन 2022, काम पूर्ण करण्याची मुदत ः 30 मार्च 2026, रस्त्यावरील पूल 25ः, झालेले काम : 50 टक्के.