कोकरूड : येत्या एक दीड महिन्यात गुढे पाचगणी, येवती उपसा योजनेच्या सर्व्हेचे अपूर्ण काम आणि योजनेचा आराखडा पूर्ण करावा. कारणे दाखवून दिरंगाई करू नये, अन्यथा या विभागातील शेतकरी एक डिसेंबरला कोल्हापूर कृष्णा खोरे कार्यालयावर विराट मोर्चाने जाणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी बोलताना दिला. ते मराठेवाडी (ता. शिराळा) येथे शिराळा, कराड, पाटण तालुक्यातील वंचित गावातील शेतकर्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शिराळाचे माजी सभापती हणमंतराव पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे निमंत्रक वसंत पाटील, उदय पाटील, बाळासाहेब माने, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, बाजीराव शेडगे, श्रमुद सदस्य सखाराम पाटील, सचिन मोरे, संदीप पाटील आणि विजय पाटील उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले की, शिराळा तालुका ठिबक सिंचन मंजूर असून कालव्याखालील चढावरील सर्वाना ठिबकने पाणी मिळणार आहे. ते शासनाने सुरू करावे किंवा शेतकर्यांना अनुदान द्यावे. त्याची अंमलबजावणी सत्वर सुरू करावी. यावेळी शिराळ्याचे सभापती हणमंतराव पाटील, वसंत पाटील, उदय पाटील, बाळासाहेब माने, शिवाजी पाटील बाजीराव शेडगे, बाळासाहेब बनसोडे, सखाराम पाटील, सचिन मोरे आदींनी आपले विचार मांडले. मेळाव्यात श्रमुदचे राज्य कार्यालय प्रमुख संतोष गोटल, आबासाहेब शेवाळे, माजी सरपंच विजय पाटील, हिंदुराव नांगरे, विष्णू पाटील, मिलिंद धर्माधिकारी, सुभाष सुतार आदी उपस्थित होते.