राहुल माने
आंधळी ः पोलिस किंवा सैन्य दलात भरती होऊन गरिबीचे पाश तोडण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या जिद्दी तरुणाचा धावपट्टीवरच अंत झाला. पलूस तालुक्यातील मोराळे येथील संग्राम धोंडिराम शिंदे (वय 23) या युवकाचा छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे मोराळे गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून शनिवारी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
21 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीसाठी 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. शेवटच्या टप्प्यात असताना संग्रामला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. उपस्थित पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संग्राम हा सध्या एम.एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. घरची स्थिती अत्यंत बेताची असून त्याचे वडील शेतीसह ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. कुटुंबावरील कर्जाचा डोंगर उपसण्यासाठी आणि आई-वडिलांना आधार देण्यासाठी संग्राम गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस व सैन्य भरतीचा कठोर सराव करत होता. अभ्यासात हुशार असलेला संग्राम पहाटे धावण्याचा सराव करायचा आणि त्यानंतर वडिलांना ऊस तोडीच्या कामात मदत करायचा.
संग्रामच्या आकस्मिक निधनामुळे भरतीची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. ‘भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या आरोग्य तपासणीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जावे आणि शारीरिक चाचण्यांच्या नियमात आवश्यक बदल करावेत’, अशी मागणी आता युवक व पालकांमधून जोर धरू लागली आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला कर्ता मुलगा गमावल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी हाक मोराळे ग्रामस्थांनी दिली आहे.