किरण पाटील
पारे : तासगाव तालुक्यातील पाडळी या गावात 39 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा सुरू आहे. सन 1986 मध्ये तत्कालीन सरपंच मुकुंद पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही परंपरा आजही गावाच्या सामूहिक श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक बनली आहे.
गाव गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असतानाही प्रत्येक चौकात स्वतंत्र गणेशोत्सव न करता गावकुसात फक्त एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे गावकर्यांच्या एकजुटीला अधिक बळ मिळत आहे. गणेशोत्सवात अनेक ठिकाणी डीजेच्या दणदणाटाने वातावरण दुमदुमून जाते. कानठळ्या बसवणारा हा कृत्रिम आवाज काही काळ उत्साह देतो खरा; पण आरोग्य आणि पर्यावरणासाठी तो धोकादायक ठरत आहे. मात्र पाडळीकरांनी या प्रवाहाला छेद देत ढोल-ताशे, हलगी, लेझीम, झांज, टाळ, मृदंग अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाविरोधी लढ्यात मंडळाने आदर्श निर्माण केला आहे.
सन 2024 मध्ये सांगली जिल्हा पोलिस दलामार्फत आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने तासगाव तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. गावातून जमा होणार्या वर्गणीतून अनावश्यक खर्च टाळून समाजप्रबोधनात्मक व्याख्याने, मोदक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे महिलांना गृहोपयोगी साहित्य बक्षीस म्हणून दिले जाते, ही बाब स्तुत्य ठरते.