chandrakant patil Pudhari Photo
सांगली

Chandrakant Patil | एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आंदोलनाच्या लिंक फार-फार लांब जातात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ‘एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना... आंबा चोरला तर समज देणे असते... आणखी काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ते ठरलेली असते... प्रत्येक गोष्टीची फाशी... फाशी... असे नसते ना...’ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ही भूमिका आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांना आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘आतंकवादी’ म्हटले आहे. याबाबत तुम्ही काय सांगाल? , यावर त्यांनी वरील भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली.

ते म्हणाले, आंदोलनाच्या सगळ्या क्लिप्स बाहेर येताहेत, तुम्हीच प्रसारित करता आहात. हे कुठे शिजले, त्यातील हेतू काय आहे? आणि या क्लिप फार लांब-लांब जातील. लोकसभेत या विषयावर चर्चेला उत्तर द्यायला माननीय अमितभाई किंवा नरेंद्रभाई बोलतील, तेव्हा सर्वांचीच पोलखोल होईल. त्यामुळे वेळीच सावध व्हा, तुमचा हेतू आम्हाला कळलेला आहे. तुमचा हेतू हा असेल की या देशामध्ये पेपर फुटू नयेत, तर ते फुटूच नयेत ना, पण एखादा पेपर फुटल्यानंतर... म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो. त्या मुलांना पुन्हा पटकन परीक्षा देता यावी, रिझल्ट लागावेत, त्यांना ॲडमिशन घेता यावे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. देशात पहिल्यांदा आपल्याला मिलिटरीला इन्व्हॉल्व्ह करावे लागले, त्यावरही टीका झाली. त्यातून सगळं ‘नीट’ झालं ते बघा ना.

ते म्हणाले, दिल्लीतील चाललेले आंदोलन जे आहे, त्यात ‘नीट’चे पेपर फुटले, त्यानंतर ती परीक्षा पुन्हा झाली. त्यात कोठेही, कणभरही गडबड झाली नाही. रिझल्ट लागले, आता कॅपराऊंड सुरू होतील. त्यामुळे त्याच विषयाला घेऊन राजकारण सुरू झालेले आहे. हे राजकारण विरोधकांनी थांबवले पाहिजे. उठसूठ राजकारण करण्यामुळे आपण देशाचे नुकसान करतो. समाजाचे, वातावरणाचे नुकसान करतो. जगामध्ये आपली प्रतिमा बिघडवतो.

देश संपवायचा आहे का? देश असा संपत नसतो

पाटील म्हणाले, ‘नीट’चे पेपर फोडणारे सगळे अटकेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तरीही आपण एकच घोषा लावून धरायचा, याच्यामागे काही तरी हेतू वेगळा आहे. अधिवेशन डिस्टर्ब करायचे. अधिवेशनात जी बिले यायची आहेत, ती येऊ द्यायची नाहीत, असा पहिला हेतू आहे. बाकी हेतू मोठ-मोठे आहेत. तुम्हाला मी अशा लांब-लांब लिंक नेऊन पोहोचवेन, अरे चाललंय काय? देश संपवायचे चालले आहे काय? देश असा संपणार नाही. मुघल येऊन गेले, ब्रिटिश येऊन गेले, पण देश काय संपवू शकले नाहीत. संपूर्ण समाज कर्मठ करू शकले नाहीत, त्यामुळे कोणी स्वप्नात राहू नये. कुठंपर्यंत लिंक गेलेल्या आहेत, याचा सर्वांनी विचार करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT