सांगली ः बेदाणा, हळद, ऊस उत्पादकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही तरतूद केलेली नाही. ना वेअर हाऊस बांधणीसाठी, ना कोल्ड स्टोअरेज उभारणीसाठी तरतूद केली आहे. तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करणारच नाही का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी संसदेत अर्थसंकल्पाबाबत उपस्थित केला.
ते म्हणाले, शेतकऱ्याच्या पीक कर्जावरील व्याज अनुदानावर तुम्ही फक्त बोलता, निर्णय होत नाही. त्यावर फक्त टाळ्या वाजवून उपयोग काय? माझ्या सांगली लोकसभा मतदार संघात हळद, बेदाणा, ऊस उत्पादकांसाठी काहीही केले नाही. कोल्ड स्टोअरेज, वेअर हाऊस उभारणीचा विचारच केलेला नाही. जलजीवन मिशनमध्ये फक्त बजेट करता, खर्च तर काहीच होत नाही. घ्या ताब्यात योजना आणि लोकांना पाणी द्या. सिंचन योजनेला ‘एआयबीपी’तून तरतुदीची मागणी करतोय. म्हैसाळ, टेंभू योजनेबाबत तुम्ही काहीच तरतूद करायला तयार नाही. सांगलीत आम्ही रेल्वे थांबे मागतोय, स्थानकाला निधी मागतोय, मात्र तुम्ही काहीच करत नाही.
ते म्हणाले, डरडोई जीडीपीत आपण 156 व्या क्रमांकावर आहोत. घोषणा खूप केल्या, त्याबद्दल अभिनंदन, पण 2022 ला सर्वांना घर देणार होता, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होता, त्याचे काय झाले? आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाने कापूस, मका, सोयाबीन उत्पादकांवर जो परिणाम होणार आहे, यावर काय उपाय केले? काय तरतूद केली? अनेक देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत वधारत असताना भारतात मात्र ते खाली जात आहे, ही चिंतेची बाब आहे. आत्मनिर्भर भारतावर चर्चा केली जाते, मात्र चीनचा माल नेपाळमार्गे भारतात येतोय. बेदाणा चोरून आयात होतोय, त्याने नुकसान होत आहे. कामगार मंत्रालयाने नवीन रोजगार निर्मितीसाठी, योजनांसाठी पुरेशी तरतूद नाही. युवा घरापासून पाच किलोमीटर दूर जायला इच्छुक नाहीत, अशी बेरोजगारीची कारणे सांगणे थांबवावे. आपल्या चुका दुसऱ्यांवर लादू नयेत.