सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेत जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप माजी खासदार संजय पाटील यांनी केला होता. त्यास जोरदार प्रत्युत्तर देत आमदार रोहित पाटील यांनी ‘आमच्या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप करून चिखलफेक करणाऱ्यांनी आधी पुरावे द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू’, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.
आमदार रोहित पाटील म्हणाले, अर्जुन पाटील हे प्रामाणिक कार्यकर्ते असून द्राक्ष विम्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच द्राक्ष बागायतदारांना तब्बल 45 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळाली आहे. अशा कार्यकर्त्यावर केवळ राजकीय द्वेषापोटी आणि बदनामीच्या हेतूने हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. संजय पाटील यांनी आरोप केलेली अर्जुन पाटील यांची गाडी विमा मदत मिळण्यापूर्वीच बँकेच्या कर्जावर घेतलेली आहे. त्याची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पूर्वी आम्हाला सत्ताधारी गटाचे म्हणणारे आज स्वतः कोणाच्या मांडीवर बसले आहेत, हे जनतेला ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले, याबाबत अद्याप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हाला शिरसावंद्य आहे.
आधी कारखान्याचे कोट्यवधी रुपये द्या, मग बोला: अर्जुन पाटील
जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील म्हणाले, माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि बालिश आहेत. हे आरोप जर सिद्ध झाले, तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र, आरोप करणाऱ्यांनी आधी नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्यांना ऊस दिलेल्या गरीब शेतकऱ्यांचे रखडलेले कोट्यवधी रुपये द्यावेत. यासोबतच जिल्हा संघाच्या औद्योगिक वसाहतीतील जागा कवडीमोल भावाने विकून आलेली रक्कम कुठे गेली, याचेही उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.