मिरज : जिल्ह्यातील उद्योगांना सुमारे 500 टन एलपीजी गॅस प्रत्येक महिन्याला लागतो. मात्र, सध्या एक टनदेखील एलपीजी गॅस मिळत नसल्याने भविष्यात उद्योजकांना मोठी किंमत मोजावी लागेल. गॅस पुरवठा नसल्याने प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. त्यामुळे या उद्योगांना गॅसचा त्वरित पुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांनी बुधवारी बैठकीत केली.
उद्योग क्षेत्रातील एलपीजी तुटवड्याच्या समस्येबाबत सांगली मिरज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या मिरज एमआयडीसीतील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत अनेक उद्योजकांनी ही मागणी केली. सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, जेष्ठ संचालक संजय अराणके, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष हेमंत महाबळ यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.\
ते म्हणाले, प्रति महिना एलपीजीचे अंदाजे मूल्य 10 कोटी रुपये आहे. गॅसचा पुरवठा नसल्याने सुमारे 300 ते 350 उद्योगांना त्याचा फटका बसत आहे. गॅस पुरवठा नसल्याने प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. या समस्येचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योगांवर अधिक झालेला दिसतो. गुजरात, गोवा यासारखी इतर राज्ये या एलपीजी समस्येमुळे अप्रभावित राहिली आहेत. कदाचित तेथील उद्योगांना पीएनजी जोडण्या असल्यामुळे त्यांना त्रास नाही. शासन निर्णयात नमूद केलेले एलपीजी पुरवठ्याचे प्राधान्य क्षेत्र जसे की औषध उत्पादक, बियाणे प्रक्रिया, मत्स्यव्यवसाय, कॉर्पोरेट कॅन्टीन, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, आमच्या क्षेत्रात अस्तित्वात नाहीत. त्यामुळे, या क्षेत्रांना दिलेले वाटप आमच्या बाधित क्षेत्रीय उद्योगांकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.