शेतीमालाच्या जीआयमध्ये महाराष्ट्र देशात पहिला  Pudhari Photo
सांगली

शेतीमालाच्या जीआयमध्ये महाराष्ट्र देशात पहिला

करण शिंदे

सांगली : मोहन यादव

भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील 38 शेती मालांचा समावेश आहे. महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. यातून राज्यातील अनेक शेतीमालास जागतिक बाजारपेठ मिळण्यास व शेतकर्‍यांचा नफा वाढण्यास मदत होत आहे. राज्याच्या विविध भागात अनेक पिके गुणवत्तेत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. माती, पाणी, हवामानानुसार काही पिके दर्जेदार आहेत. पण मार्केटिंग व जीआय मानांकन नसल्याने ही पिके बाजारपेठेत मागे पडत आहेत.

अशा शेतीमालांची उलाढाल वाढावी, शेतकर्‍यांचा नफा वाढावा, यासाठी सरकार, अनेक स्वयंसेवी संस्था व काही तज्ज्ञ सातत्याने प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून याची चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. 2019-20 अखेर 1232 उत्पादकांची नोंदणी झाली होती. फलोत्पादन विभागामार्फत नोंदणीसाठी प्रयत्न केल्याने 2024 अखेर 11423 उत्पादकांची नोंदणी झाली आहे. देशात एकूण झालेल्या कृषी उत्पादकांच्या अधिकृत वापरकर्ता नोंदणीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. सध्या देशात 200 व महाराष्ट्रातील 38 कृषी उत्पादनांची जीआय मानांकनाव्दारे विक्री सुरू आहे. यात महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

जीआय म्हणजे काय?

संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी करता येते. मानांकन देण्याची कार्यवाही चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री येथून करण्यात येते. या नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग होण्यास मदत होते. लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते. पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करून विक्री केल्यास उत्पादनास अधिक किंमत मिळते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते. तेच महत्त्व जीआय मानांकनास असते. त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जादा आर्थिक उत्पन्न मिळते.

भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची गुणवत्ता व दर्जाच्या मानांकनाची नोंद आहे, जी त्या-त्या भागातील माती, पाणी, हवामानाशी निगडित आहे. यासाठी सरकारबरोबर राहून आम्ही प्रयत्न करीत आहे. यातून अनेक शेतीमालांना हे मानांकन मिळाले आहे. याचा पिकांना व शेतकर्‍यांना फायदा होत आहे. मानांकन प्राप्त कृषी माल निर्यातीस लाभकारक ठरत आहे. वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व नैसर्गिक जैवविविधतेमुळे राज्यातील अनेक नवीन कृषी उत्पादनांना हे मानांकन प्राप्त करण्यास मोठा वाव आहे.
-गणेश हिंगमिरे, जीआय मानांकन तज्ज्ञ, पुणे

या पिकांना मिळाले मानांकन

पालघरचा चिकू, बहाडोली जांभूळ, बदलापूरचे जांभूळ, अलिबागचा पांढरा कांदा, वेंगुर्ल्याचा काजू, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा कोकम, कोकण हापूस, पुरंदरचे अंजिर, मुळशीचा आंबेमोहर तांदूळ, सोलापूरचे डाळिंब, मंगळवेढ्याची ज्वारी, कोल्हापूरचा आजरा घनसाळ राईस, गूळ, सांगलीचा बेदाणा, हळद, साताराचा वाघ्या घेवडा, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, नाशिक व्हॅली वाईन, लासलगावचा कांदा, जळगावची केळी, जळगाव भरीत वांगी, नंदुरबारमधील नवापूर तूरडाळ, नंदूरबारचा आमचूर, नंदूरबारी मिरची, जालना मोसंबी, जालना दगडी ज्वारी, बीडचे सीताफळ, छत्रपती संभाजीनगरचा मराठवाडा केसर, लातूरचे पान, चिंचोली चिंच, लातूरमधील बोरसुरी डाळ, लातूरची काष्टी कोथिंबीर, धाराशिवमधील कुंथलगिरी खवा, हिंगोलीतील बसमत हळद, भिवपुरीलाल मिरची, वर्ध्यातील वायगाव हळद, चिनोर भात, नागपूरची संत्री.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT