सांगली : सांगलीमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे एलपीजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची झुंबड उडाली आहे. गॅस भरण्यासाठी पाच ते सहा तास रिक्षा चालकांना थांबावे लागत आहे. जवळपास दीड ते दोन किलोमीटर इतक्या लांब रांगा रिक्षा आणि वाहनांच्या लागल्या आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांमधून संताप देखील व्यक्त केला जातो आहे.
वाहनांची चाके थांबली
फक्त सीएनजीवर चालणारी 985 आणि पेट्रोल व सीएनजीवर चालणारी 206 वाहने आहेत. फक्त एलपीजीवर चालणारी 88, तर पेट्रोल आणि एलपीजीवर चालणारी 3 हजार 739, अशी जिल्ह्यात 5 हजार 18 वाहने आहेत. पण गॅस तुटवड्यामुळे या साऱ्यांचीच चाके थांबल्यासारखी परिस्थिती आहे.
युद्धाच्या परिस्थितीमुळे गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ झाल्याचे सांगतात. पण तोही मिळत नाही. एलपीजी गॅसचा तुटवडा आणि दरवाढीचा फटका रिक्षा चालकांना बसतो आहे. याला जबाबदार कोण?- संतोष कारंडे, बजरंग नेसूर, रिक्षाचालक, कुपवाड.
गॅस तुटवड्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे. इतकेच नव्हे, तर गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. 55 रुपये असणारा एलपीजी गॅस आता 80 रुपये इतक्या दराने विक्री चालू आहे. दोन-तीन तास नंबरात थांबावे लागते आहे.- संजय महामुनी, रिक्षाचालक, कुपवाड.