कडेगाव शहर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असून, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशमुख म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा खंडित झाला आहे, त्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी दिली जाणार आहे. योजनेअंतर्गत ३२ लाख थकबाकीदार आणि २४ लाख नियमित कर्जफेड करणारे असे एकूण ५६ लाख शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. तसेच २ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्जाची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विविध कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्याने मदतीचा हात दिला जात असून, भाजप सरकार हे खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांची उन्नती करणारे सरकार असल्याचे त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. विशाल मोहिते, विकास सूर्यवंशी, संजय गोंदील, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.