कासेगाव : शिराळा उत्तर विभागातील पाचुंब्री-वाटेगाव सरहद्दीवर शिनगार वाडा परिसरात काळवट रानात रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान अनिल राजाराम पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने चार कालवडी ठार केल्या.
तसेच याच परिसरात जवळ असलेल्या प्रकाश किसन पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममधील 60 कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. या घटनेमुळे वाटेगाव, पाचुंब्री, बांबवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी शिराळा वनरक्षक स्वाती कोकरे, रखवालदार दादासाहेब शेटके, टाकवे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिसाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. सकाळी अनिल पाटील हे आपल्या जनावरांच्या शेडमध्ये आले असता सदरची घटना त्यांच्या लक्षात आली. चार कालवडी मृत्युमुखी पडलेल्या लक्षात आले. बिबट्याने गेल्या दोन महिन्यांपासून शिराळा उत्तर विभागातील पणुंब्रे, टाकवे परिसरात थैमान घातले आहे.