सांगली : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ‘उबाठा’ या पक्षाची अंतिम विधी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांना रामरक्षा स्तोत्राची आठवण झाली आहे, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ‘उबाठा’ने रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण राज्यव्यापी आंदोलन केले. यासंदर्भात सोमय्या म्हणाले, माणसाला स्मशानभूमीत जाताना रामाच्या नावाची आठवण येते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अंतिम संस्कार विधी प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून त्यांना रामाच्या नावाची आठवण झाली.
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक बांधला आहे. या मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला आहे. या घटनेमुळे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात सोमय्या म्हणाले, मिसिंग लिंकवर दरड का कोसळली, मिसिंग लिंक तयार होताना पुरेशी काळजी घेतली नव्हती का? हे सर्व काही तपासात समोर येईल. त्यासंदर्भात आताच काही बोलणे उचित होणार नाही.