नेवरी : कडेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बेसुमार वृक्षतोड चालू आहे. तोडलेल्या वृक्षांच्या लाकडाची वाहतूक रात्रीस केली जात आहे. याबाबत वन विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.
तालुक्यात शासनाकडून प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड मोहीम प्रत्येक ग्रामपंचायत परिसरामध्ये प्रभावीपणे राबवली जात आहे. प्रत्येक गावाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी यावर खर्च होत आहे. यामध्ये प्रत्यक्षात वृक्ष लागवड किती होते, हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरीकडे तालुक्यामध्ये खुलेआम होणारी वृक्षतोड पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. आधुनिक यंत्राच्या साहाय्याने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे परिसर भकास होत आहे. लाकूड विक्रीचा धंदा करणारे व्यापारी आणि वन विभाग यांचे साटेलोटे असल्यामुळे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वृक्षतोडीचे सर्वच नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड केली जात असून ट्रॅक्टर, ट्रक अशी वाहने लाकडे भरून रात्रीच्यावेळी शहराकडे जात आहेत. ओढे, नदीकाठ, शेततळी, बंधारे, पाणंदी, शेतनाले यांच्या सभोवतालच्या अनेक वृक्षांच्या तोडी दिवसा यंत्राच्या साहाय्याने झटपट होत असल्यामुळे या ठिकाणचा परिसर काही तासात भकास होत आहे.
कडेगाव तालुक्यामधील बेसुमार वृक्षतोडीला पायबंद करायचा असेल, तर प्रत्येक गावामधून सामूहिक जनरेटा हवा. पर्यावरणप्रेमी संघटित होऊन अवैध वृक्षतोडीस पायबंद घातला पाहिजे.- रामचंद्र गुरव, पर्यावरणप्रेमी, नेवरी