ईश्वरपूर : शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करीत शहरातील नशेच्या गोळ्या विकणारी केंद्रे उद्ध्वस्त करण्यासंदर्भात माझी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला. सध्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. मात्र त्यातून निश्चित मार्ग काढू, काळजी करू नका,असा दिलासाही त्यांनी दिला.
मनसेच्या येथील महिला शहराध्यक्षा करिष्मा जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा आ. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, पाणीपुरवठा समितीचे सभापती एल. एन. शहा, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, कृष्णाचे संचालक संजय पाटील, ‘राजारामबापू’चे संचालक अतुल पाटील, बूथ अध्यक्ष राजेंद्र बाणेकर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या गळतीबरोबरच ज्यांच्या हाती सत्ता होती, त्यांनी नवीन पाणी योजनेबाबत फारसे काही केले नाही. मात्र मध्यंतरी नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव दिला आहे, त्याचा राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, आहे त्या योजनेतून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे गळती रोखणे आणि पाणी पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही लवकरच प्रभाग बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहोत.
करिष्मा जाधव म्हणाल्या, आ. जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आनंदराव मलगुंडे म्हणाले, येत्या काही दिवसात शहरात 12 कोटी रुपयांची रस्ते, गटारींची कामे सुरू करत आहोत. तुम्हाला विश्वासात घेऊन पुन्हा शहराचा विकास गतिमान करू. खंडेराव जाधव म्हणाले, आ. जयंत पाटील यांनी गेल्या तीन महिन्यात 3-4 बैठका घेऊन शहराच्या विकासाबद्दल सूचना केल्या आहेत. शहराच्या विकासाला निधी कमी पडणार नाही, त्याबद्दल कोणतीही चिंता नको. शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, आमचा पक्ष आणि नेतृत्व हे महिलांना संधी आणि सन्मान देणारे आहे. पाणी पुरवठा सभापती एल. एन. शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी प्रास्ताविक केले. नितीन वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले. बूथ अध्यक्ष राजेंद्र बाणेकर यांनी आभार मानले.