ईश्वरपूर : युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गीय लोक या आवाहनाला प्रतिसाद देतीलच, पण मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करावी. फक्त एक वाहन आणि एक अंगरक्षक देण्यात यावा, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे.
समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत आ. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना हे आवाहन केले आहे. आ. पाटील यांनी म्हटले आहे की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या... वाजवल्या. दिवे लावायला सांगितले... तेही लावले. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याहीवेळेला ते साथ देतीलच.
पण सोबत 20-30 वाहनांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर वाहनांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. मुख्यमंत्री महोदयजी, प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्वच मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करावी, मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेत, पण सत्ताधाऱ्यांनीही ‘राष्ट्र प्रथम’ हे धोरण कृतीत उतरवावे, अशी अपेक्षा आहे.