जत शहर : जत येथील मल्लाळ रस्त्यावर झालेल्या श्रीधर निमगोंडा यडगोंड (वय 40, रा. बिळूर) यांचा खून त्यांच्याच दोन सख्ख्या भावांनी केल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीच्या वादातून त्यांच्याच भावांनी मिळून दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मृत श्रीधर यडगोंड यांचा मुलगा शांतगौडा श्रीधर यडगोंड (वय 19, रा. बिळूर) याने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चुलते प्रभाकर निमगोंडा यडगोंड आणि गंगाधर निमगोंडा यडगोंड यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, यडगोंड कुटुंबामध्ये आजोबांच्या नावावर असलेल्या सात एकर शेतीच्या वाटणीवरून गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू होता. जमिनीची विक्री आणि विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून श्रीधर यांचा त्यांचे भाऊ प्रभाकर आणि गंगाधर यांच्याशी सतत संघर्ष होत होता. याप्रकरणी सांगली येथील दिवाणी न्यायालयात खटलाही प्रलंबित आहे.
घटनेदिवशी सकाळी 11 वाजता सुमारास श्रीधर हे जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घरातून निघाले होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता संशयित प्रभाकर याने फिर्यादी शांतगौडा याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जत-बिळूर रस्त्यावरील सिद्धेश्वर हॉलसमोर श्रीधर यांना मारहाण होत असल्याची माहिती मिळताच शांतगौडा आणि त्यांची आजी घटनास्थळी पोहोचले.
तेथे श्रीधर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांच्या चेहऱ्यावर, हनुवटीवर आणि पायांवर गंभीर जखमा होत्या. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि काचेचे तुकडे विखुरलेले होते. शांतगौडा यांनी वडिलांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.