ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील अतिक्रमणांबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरु केल्या आहेत. या मार्गावर अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना दोन दिवसात अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.
नगरपालिकेने शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्याना केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, आपले शहर नीटनेटके आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सतत प्रयत्नशील आहे. परंतु शहरातील पेठ, ताकारी, बहे, वाघवाडी, कामेरी या प्रमुख रस्त्यावरील फुटपाथ, नाले, यावर अनेक ठिकाणी हातगाडे, साहित्य, फलक लावण्यात आलेले आहेत. या अतिक्रमणांमुळे सामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ज्या नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी रस्ते, गटारी किंवा इतर ठिकाणी अनधिकृत फलक, साहित्य, हातगाडे किंवा इतर गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यांनी येत्या 2 दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे पालिका स्वतःहून दूर करून ताब्यात घेणार आहे. यामुळे सर्वांनी तातडीने सहकार्य करून कारवाई टाळावी.