सांगली : युद्धसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेली तीव्र गॅस टंचाई आणि दर वाढल्याचे निमित्त करून हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ केली होती. आता व्यावसायिक गॅसच्या किमती चारशे रुपयांनी ओसरल्या असल्या, तरी हॉटेल चालकांनी वाढवलेले हे दर मात्र कायम ठेवले आहेत. आता खाद्यतेल, डाळी आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ ही त्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या फेब्रुवारीनंतर देशात तीव्र गॅस टंचाई निर्माण झाल्याने व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद केला होता. जूनमध्ये हा पुरवठा पूर्ववत झाला, मात्र १९ किलोच्या व्यावसायिक गॅसचा दर २,७१६ रुपयांवरून थेट ३,११६ रुपयांवर पोहोचला. तुटवड्याच्या काळात हॉटेल व्यावसायिकांनी काळ्या बाजारात अगदी ४ हजार रुपयांपर्यंत सिलिंडर खरेदी केले होते. १ ऑगस्ट रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात झाली आणि गेल्या दीड महिन्यात एकूण दर जवळपास चारशे रुपयांनी कमी झाला आहे.
मात्र, हॉटेल्समधील जेवण, खाद्यपदार्थ अद्याप महागच आहेत. मागील काही महिन्यांत झालेला तोटा सावरण्यासाठी ही कपात अपुरी पडत असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे. याशिवाय भाजीपाला, दूध, खाद्यतेल, डाळी असा कच्चा माल, कामगारांचे पगार, वीज बिल, वाहतूक खर्च वाढल्याने खर्चात घट झालेली नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी झालेली ५ ते १० टक्के दरवाढ कायम ठेवण्यात आली आहे.