नांद्रे : पुढारी वृत्तसेवा
यंदा मान्सूनने वाढविलेला मुक्काम आणि बदललेल्या हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही वर्षात प्रथमच नांद्रे परिसरात सोयाबीनसह खरीप चांगला साधला होता.
मात्र, पावसाने हाता- तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. नांद्रे, कर्नाळ, पद्माळे, नावरसवाडी परिसरात अजूनही शेतातच असलेली पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. मिरज पश्चिम भागात खरिपाचे पीक घेताना पावसाचा अंदाज घेतला जातो.
यातील अनेक गावांना पुराचा फटका बसत असल्याने ही काळजी घ्यावी लागते. तरीही धाडसाने या भागातील शेतकरी पिके घेतात. यंदा प्रथमच नांद्रे परिसरात सोयाबीनचे पीक जोमात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यासाठी शेतकऱ्यांनी वाढलेल्या पावसाचीही तमा न बाळगता मशागत उरकून घेत सोयाबीनला प्राधान्य दिले होते.
सोयाबीनला दरही समाधानकारक असल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असतानाच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्व पिके पाण्यात गेली आहेत. चिंतेची बाब म्हणजे या भागातील पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी शेतातच थांबून आहे. यामुळे सोयाबीनला फटका बसला आहे.
सध्या अनेक भागात सोयाबीनची मळणी सुरू असली तरी पावसाने या कामातही अडथळे येत आहेत. काही शेतकऱ्यांना तर रस्त्यावर मळणी उरकून घ्यावी लागत आहेत. सोयाबीन ओले असल्याने मशीनमध्ये अडकण्याचेही प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे सोयाबीनचे पीक यंदा हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
पीकविमा योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.