सांगली : सांगलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात चांगला पाऊस झाला, तर पश्चिमेकडील शिराळा आणि वाळवा तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहिले. पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाल्याने यंदा महापुराचा धोका टळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील तलाव, ओढे, नाले तुडुंब भरले होते. धरणांतील पाणीसाठाही 70 टक्क्यांहून अधिक झाला होता. दरवर्षी जुलैचा शेवटचा आठवडा ते 15 ऑगस्टदरम्यान महापुराची स्थिती निर्माण होते. त्यामुळे जूनमधील पावसामुळे यंदा लवकर पूर येईल की काय, अशी भीती नागरिकांना वाटत होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पुराची स्थिती निर्माण झाली नाही, ज्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 11.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस जत तालुक्यात 28.5 मि.मी. झाला आहे. जत : 28.5 मि.मी. (1 जूनपासून एकूण 189.5 मि.मी.), कडेगाव : 19.3 मि.मी. (234.4 मिमी), आटपाडी : 14.5 मि.मी. (201.7 मि.मी.), पलूस : 8.9 मि.मी. (288.8 मि.मी.), तासगाव : 8.6 मि.मी. (197.4 मि.मी.), कवठेमहांकाळ : 8.1 मि.मी (176.5 मि.मी.), मिरज : 6.9 मि.मी (217 मिमी), खानापूर-विटा : 6.5 मि.मी. (167 मि.मी.), वाळवा-इस्लामपूर : 5.9 मि.मी. (341.1 मि.मी.), शिराळा : 4.3 मि.मी. (857 मिमी).