कडेगाव/देवराष्ट्रे : सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील शाळेमध्ये शालेय पोषण आहारात किडे आढळून आले. तसेच अशीच घटना पलूसमध्येही घडली होती. हे प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. शालेय पोषण आहाराच्या संपूर्ण बॅचची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. जीवावर बेतणार्या घटना वारंवार घडत आहेत आणि हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी शासनाने याबाबत अधिक गंभीर होणे गरजेचे आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. शालेय पोषण आहाराबाबत त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, शालेय पोषण आहाराबाबत शासनाने अधिक गंभीर होण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी शालेय पोषण आहारात बेदाणे व अन्य पौष्टिक ड्रायफ्रूट्स समाविष्ट करावेत, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधिमंडळात केली. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होते. त्यामुळे बेदाण्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना उत्तम पोषण मिळेल आणि स्थानिक शेतकर्यांनाही मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शासनाने तातडीने कठोर धोरण आखून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार डॉ. कदम यांनी केली.