कडेगाव : पुढारी वृत्तसेवा : कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या विद्यार्थिंनी युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या आहेत. त्यांचा २४ तासानंतर पालकांशी संपर्क झाला. आम्ही दोघी ठीक आहोत, केवळ एवढाच मेसेज या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना पाठवला आहे. त्यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
रविवारी सकाळपासून त्यांचा पालकांशी संपर्क तुटला होता. युक्रेनने मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांशी संपर्क साधता येत नव्हते. दरम्यान, आज सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास ऐश्वर्या व शिवांजली या दोघांनी आपल्या पालकांना टेक्स्ट मेसेजने आम्ही ठीक आहोत, असा एकच संदेश पाठवला आहे. त्यामुळे त्या सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परंतु, रशियाने युद्ध गती वाढवत युक्रेनवर हल्ला सुरूच ठेवला आहे. विद्यार्थी राहत असलेल्या खरकीव्हमध्ये देखोल रशियन सेना पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात युद्ध परिस्थितीमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांचे खाण्या पिण्याचे वांदे सुरूच आहेत. अजून ही विद्यार्थी होस्टेलच्या बँकरमध्येच आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. आपल्या मुली सुखरूप मायदेशात पोहचाव्यात, यासाठी भारत सरकारने लवकरात लवकर त्यांना आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ