सांगली : येथील सत्यसाईनगरमधील पिण्याचा पाणी नमुना प्रयोगशाळा तपासणीत दूषित आढळला आहे. या पाण्यात कॉलिफॉर्म जीवाणूंचे प्रमाण 16 हून अधिक आहे, तर ई-कोलाई जीवाणूही आढळला आहे. या जीवाणुमिश्रित पाण्यामुळे पोटविकार, कावीळ, यासारखे जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. आरोग्य विभागाकडूनही सर्वेक्षणाची आवश्यकता आहे.
सत्यसाईनगर येथील एका व्यक्तीने शिबिरात रक्तदान केले होते. मात्र हे रक्त हिपॅटायटीस-बी पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीतून निदर्शनास आले. त्यानंतर अन्य एका खासगी प्रयोगशाळेतून रक्ततपासणी केली असता ‘हिपॅटायटीस बी’ असल्याचे निदान पुन्हा झाले. त्यानंतर संबंधित कुटुंबाने घरातील पिण्याच्या पाण्याची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली. या पाणी नमुन्यात कॉलिफॉर्म व ई-कोलाई हे जीवाणू आढळले. त्यामुळे हे पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले.
कॉलिफॉर्म हे जीवाणू मानवी व प्राण्यांच्या मलमूत्रातून पाण्यात येतात. पिण्याच्या पाण्यात ई-कोलाई हे जीवाणू आढळणे म्हणजे मलमूत्रजन्य प्रदूषण झाल्याची खात्री होय. या जीवाणुंमुळे मानवी आरोग्याला थेट धोका निर्माण होतो. जुलाब, उलटी, पोटदुखी, कावीळ आदी आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे संबंधित परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने, तसेच आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित व्यक्तीच्या घरातून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.