देवराष्ट्रे : गरज नसताना सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला असून छाताडावर गोळ्या झेलू, पण शेतजमीन देणार नसल्याचा इशारा सरकारला दिला आहे. शक्तिपीठविरोधात देवराष्ट्रे, कुंभारगाव, शिरगावमधील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी शासनास निवेदन दिले.
नागपूर-गोवा या 856 कि.मी.च्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे कडेगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुरुवारी देवराष्ट्रे, कुंभारगाव, शिरगाव, वांगी येथील शेतकऱ्यांनी कडेगावच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. निवेदनात म्हटले आहे की, या महामार्गाच्या आराखड्यात केवळ जमीनच नव्हे, तर गोठे, घरे, विहिरी, फळबागा जमीनदोस्त होणार आहेत. अनेक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन होणार आहेत.