सांगली : दिवाळी संपल्यानंतर थंडी जाणवते, पण यंदा ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस पडत होता. ऋतुमानात बदल होत आहेत. परिणामी, पाऊस थांबायला तयार नव्हता आणि थंडीला यायला संधी नव्हती. उशिरा का होईना, पण थंडी दाखल झाली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात थंडी जाणवू लागली आहे. धुकेही पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभरात तालुक्याच्या तापमानामध्ये आणखी घसरण होणार आहे.
चालूवर्षी निसर्गाने कहर केला. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अगदी नोव्हेंबरपर्यंत कोसळत होता. पाऊस सतत लागून राहिला. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची रिपरीप चालूच राहिली आणि त्यामुळे थंडीची सुरुवात लांबत गेली. गेल्या आठवड्यापासून पाऊस गायब झाला आणि हवामानात बदल झाला. सुरुवातीला गारवा आणि नंतर गारठा जाणवायला लागला. पहाटे आणि संध्याकाळीही वातावरणात गारवा जाणवतो आहे. पुढील आठवडाभर तापमान आणखी कमी होत कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.