सांगली ः सांगलीतील पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.  (छाया ः सचिन सुतार)
सांगली

आरोपी निर्दोष सुटण्यामागील त्रुटी दूर करा : मुख्यमंत्री फडणवीस

सांगलीत कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने सतर्क रहावे. न्यायालयीन खटल्यात आरोपी निर्दोष सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असलेल्या पोलिस ठाणेनिहाय आढावा घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेत त्रुटी दूर कराव्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सांगलीतील पोलिस मुख्यालयात गुन्हे आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अप्पर पोलिस अधीक्षक रितु खोखर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खटले निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करावा. पोलिस ठाणेनिहाय आढावा घेऊन यातील त्रुटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई- समन्सची प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. जिल्ह्यामध्ये सर्व उपाय करून दोष सिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे. अमली पदार्थविरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलिस ठाण्यांना सूचित करावे. निवडणूकदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला बेपत्ता होण्यासंदर्भातील गुन्ह्यांत गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलिस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा, अशी सूचनाही त्यांनी केल्या.

दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवून गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे. आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालले पाहिजेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, असेही फडणवीस म्हणाले. पोलिस अधीक्षक घुगे यांनी जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कामगिरीविषयक सादरीकरण केले. पोलिस दलाची विशेष कामगिरी, कल्याणकारी उपक्रम, जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात आलेले उपक्रम आणि आव्हानांची माहिती दिली. कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT