ईश्वरपूर : येथील आठवडा बाजारात जागेवर बसण्यावरून भाजीपाला विक्रेते, व्यापारी व नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. वादानंतर विक्रेत्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने अंगावर डिझेल ओतून घेतल्याने धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच या महिलेस रोखले.
रविवारचा आठवडा बाजार तहसील चौकापासून मार्केट यार्डपर्यंत भरवण्याचे पालिकेच्या बैठकीत ठरले होते. त्यावेळी वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र रविवारी सकाळपासूनच विक्रेते रस्त्यावर बसल्याने पालिका कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली. काही व्यापाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याने तणावाचे वातावरण झाले. दुपारपर्यंत हा वाद सुरूच होता.
दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास विक्रेत्यांनी पोलिस ठाणे गाठले. तेथे एका भाजी विक्रेत्या महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिला रोखले. अखेर पोलिस व नगरपालिका कर्मचारी, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजकीय लोकांनी मध्यस्थी करत, रस्त्यावर बाजार भरवताना 17 फूट रस्ता सोडून बाजूला बसण्याचे ठरले. यावेळी बसण्याच्या जागेवर पट्टे मारून व्यापाऱ्यांना जागा करून देण्यात आली. मटण मार्केटच्या पुढेपर्यंत बाजार गेला होता. काही व्यापारी बाजार समितीच्या कमानीपासून आतील जागेवर बसले होते. यानंतरही काही व्यापाऱ्यांमध्ये जागेवर बसण्यावरून वादावादीचे प्रकार झाले. सकाळपासून काही व्यापाऱ्यांनी या वादात न पडता अंबिका देवालयाशेजारी बाजार भरवला. दुपारी चारनंतर ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना जागा मिळाली नाही.