सांगली : महायुती एकसंध आहे. जिवंत माणसांत कुरबूर चालायची. काही कुरबुरी असतील, तर नीट करण्याची व्यवस्था आहे. कुरबुरी नीट करू. पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माणसांना समजवण्यात माहीर आहेत. काही ठिकाणी नाराजी असेल तर ते नाराजी दूर करतील, असे भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांगलीत सोमवारी विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजप नेते व सांगली महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तसेच सांगली व मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, आ. मनोज घोरपडे, उमेदवार धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सम्राट महाडिक, माजी आ. दिनकर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजप नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणूक महायुतीसाठी एकतर्फी आहे. मतदारांनी एकसंध राहावे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, त्याला बळी पडू नये.
पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील म्हणाले, एका कुटुंबातील रक्ताची चार माणसेही एकसंध नसतात. त्यांच्यात मतभेद असतात. कुटुंबप्रमुख त्यांच्यातील मतभेद दूर करत असतो. महायुतीत कोणात काही मतभेद असतील, नाराजी असेल तर ती दूर होईल.मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी आहे.
जागतिक परिणामांमुळे महागाई
पाटील म्हणाले, जागतिक राजकारण हे जगावर कोणाचे प्रभुत्व, यावरून सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्याचे इंधन संकट उभे ठाकले आहे. त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावध राहण्याचे आवाहन केले होते. इंधनाचा साठा पुरवून वापरावा लागेल, असे स्पष्ट केले होते. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने इंधन महागले. परिणामी वस्तूंचे दर वाढले आहेत.