सांगली : ‘एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया व अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया,’ असा संकल्प प्रत्येक सांगलीकराने करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले.
अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा अभियानांतर्गत नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, आपण पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमली पदार्थांचे सेवन व तस्करी रोखण्यासाठी प्रशासन व प्रतिबंध, प्रबोधन आणि समुपदेशन ही त्रिसूत्री ठेवून ‘अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा’ हे अभियान हाती घेतले. त्यातून गेले दीड वर्ष विविध उपक्रमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून ६०० शिक्षकांना व हजारो विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था करण्यात आली. अशा अनेक संयुक्त उपक्रमांतून व्यापक जनजागृती झाल्याने जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यात यश येत आहे.
प्रास्ताविक पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले. यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. पदयात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिफितीद्वारे दिलेली अमली पदार्थविरोधी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी नशामुक्त सांगलीचा सामूहिक संकल्प करण्यात आला. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कल्पद्रुम मैदान ते पोलिस मुख्यालय यामार्गे पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस दल, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.