आष्पाक आत्तार
वारणावती : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत या 24 तासात 83 मिलिमीटर, तर सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात 43 मिलिमीटर अशी एकूण 32 तासात 126 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. आजअखेर एकूण 2305 मिलिमीटर पाऊस येथे झाला.
पावसाचा जोर असल्यामुळे धरण 93.19 टक्के भरले आहे. धरणात 12244 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून 10 हजार व वीज निर्मिती केंद्रातून 1630 असा एकूण 11630 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे.
गेल्या दोन दिवसापासून चांदोली परिसरात सलग अतिवृष्टी सुरू आहे. गतवर्षीपेक्षा जवळपास 700 मिलिमीटर पाऊस यंदा कमी पडला आहे. सध्या पावसाचा जोर कायम आहे. यात वाढ झाली तर धरणातील विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाकडून दिला आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणार्या पाण्याची आवक यामुळे धरणाची पाणी पातळी वेगाने वाढू लागली आहे. त्यातच धरण 93 टक्के भरले आहे. त्यामुळे जितकी आवक होते, तितक्याच प्रमाणामध्ये विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठची पूरपरिस्थिती वाढण्याची शक्यता आहे.