सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ अंतर्गत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड (एम) ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातीलच मळणगाव ग्रामपंचायतीने द्वितीय आणि जत तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
जिल्हा परिषद सांगलीच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत या स्पर्धा झाल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तपासणी समितीने शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र ग्रामपंचायतींची पाहणी व मूल्यमापन केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अलकूड (एम) ग्रामपंचायतीस ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या मळणगाव ग्रामपंचायतीस ४ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या गुळवंची ग्रामपंचायतीस ३ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ग्रामीण भागात लोकसहभागातून स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी या स्पर्धेचा निश्चितच प्रेरणादायी परिणाम होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) किरण सायमोते यांनी व्यक्त केला.