इस्लामपूर : शेती उत्पादन वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पेठ (ता. वाळवा) येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती’ या विषयावर कृषी विभागातर्फे आयोजित शेतकरी परिसंवाद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी विभाग व संभाजीराव पाटील प्रतिष्ठान (तांबवे) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उमेशचंद्र सारंगी, माजी अप्पर मुख्य सचिव (कृषी) नानासाहेब पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, युवा संशोधक सारंग नेरकर, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, चिमण डांगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा मेळावा शेतकर्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. या परिसंवादात वक्त्यांनी सुलभ भाषेत एआय तंत्रज्ञान उलगडून सांगावे. शेतीचे उत्पादन व शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनस्तरावर अनेक अनुदान योजना आहेत. शेतकर्यांनीही शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. काळाची गरज ओळखून त्यादृष्टीने वाटचाल करावी. शेतकर्यांचे उत्पादन, उत्पन्न वाढावे, शेतीमालास चांगला भाव मिळावा, यासाठी ठिबक सिंचन, शेती व शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचे शासनाचे धोरण आहे. मक्यापासून 52 प्रकारची उपउत्पादने तयार करता येतात. अशाच पध्दतीने शेतकर्यांनी शेतीमालाचे उत्पादन करण्याबरोबरच नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
नानासाहेब पाटील म्हणाले, शेतकर्यांनी पारंपरिक शेती न करता पीक पॅटर्नबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, संरक्षित शेती करावी, फळबाग लागवड करावी, उपउत्पादने तयार करून आत्मनिर्भर व्हावे. तसेच, कुटुंबातील एक सदस्य शिक्षित करून त्याला अकृषिक क्षेत्रात पारंगत करावे. यावेळी कृषी निर्यात व कृषी व्यापार या विषयावर निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उमेशचंद्र सारंगी, केळी निर्यातीवर किरण डोके, डाळिंब उत्पादन व निर्यातीबाबत प्रभाकर चांदणे यांनी मार्गदर्शन केले. नानासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.