सांगली : शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पर्यावरण संवर्धन कायदा व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल महापालिका तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.
सुनील फराटे यांनी पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. त्यातून नदीचे प्रदूषण होत आहे. नदीची जैवविविधता खालावली आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ताही खालावली आहे.नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. परिसरात विविध औद्योगिक क्षेत्रे आहेत. प्रक्रिया न केलेले औद्योगिक सांडपाणी थेट शेरीनाल्यामध्ये मिसळले जात आहे. शेरीनाल्यामधून हे पाणी कृष्णा नदीत मिसळत आहे. शासकीय यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
शेरीनाल्याचे दूषित पाणी नदीत मिसळू नये म्हणून महापालिकेने राबविलेले उपक्रम कागदावर आहेत. दूषित पाणी नदीत जाण्यापासून रोखण्यात महापालिकेला अपयश आले आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेचे अधिकारी तसेच संबंधित सरकारी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.