सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली, मिरज शहरातून गुरुवारी तब्बल 98 चाकांचा भला मोठा कंटेनर नेण्यात आला. कंटेनरला रस्ता करून देताना पोलिस आणि महापालिका कर्मचार्यांची चांगलीच कसरत होत होती. यामध्ये ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीचे साहित्य होते. हे मशीन रत्नागिरी ते नागपूरकडे पाठवल्याची माहिती मिळाली.
सकाळी दहाच्या सुमारास हा कंटेनर इस्लामपूरमार्गे सांगलीत आला. त्यानंतर हा कंटेनर पुष्कराज चौक, विश्रामबागमार्गे मिरजेला नेण्यात आला. ताशी पाच ते सहा किलोमीटर गतीने हा कंटेनर नेण्यात येत होता. मा अन्नपूर्णा ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या या कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यासाठी कंटेनरला जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येत होती. सायरनचा आवाज करीत पोलिस गाडी याला मार्ग करून देत होती. पोलिस बंदोबस्त आणि महापालिका कर्मचारी यासाठी तैनात होते. कंटेनरला जाण्यासाठी बर्याच वेळेला झाडांच्या फांद्या तोडल्या तर विजेच्या तारा उंचावून यासाठी मार्ग करून देण्यात येत होता. अवजड वाहनांना शहरात प्रवेशासाठी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत बंदी असताना याला कशी परवानगी मिळाली याची माहिती मिळू शकली नाही. या कंटेनरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.