विजय लाळे
विटा, पुढारी वृत्तसेवा : सातारा, सांगली जिल्हातील दुष्काळी भागाला लाभ होण्यासाठी पुणे ते बंगळूरूच नव्हे तर आम्ही आता मुंबई ते पुणे बंगळूरू असा नवीन द्रुतगती महामार्ग करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली. विटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विटा येथे आज (दि. 4) सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दहिवडी-मायणी-विटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-160 च्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. या रस्त्याची एकूण लांबी 52.70 किमी असून त्याचा अंदाजे खर्च 632 कोटी रुपये इतका आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, राजाराम गरुड, माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल म. बाबर, सुहास बाबर, अविनाश चोथे, किशोर डोंबे आदी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, मुंबईच्या अटल ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर तिथून मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा एक नवीन महामार्ग तयार केला जाईल. तो पुणे, सातारा, सांगली, बेळगाव असा पुढे जाईल. जेएनपीटी चौक ते शिवडी, या भागाचा डीपीआर पूर्ण झाला आहे. याचे महिनाभरात दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम सुरू होणार आहे आणि उर्वरित पन्नास हजार कोटींची कामे पुढल्या सहा महिन्यात पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रात याची 307 किमी आणि कर्नाटकात 493 किमी लांबी आहे. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे दीड तास आणि तिथून पुढे बंगळूरूला जायला साडेचार ते पाच तासात लागतील. या महामार्गाची सातारा जिल्ह्यात 104 किमी, रायगड जिल्ह्यात 35 किमी, पुणे जिल्ह्यात 128 किमी आणि सांगली जिल्ह्यात 74 किमी लांबी असेल. महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. विशेषत: सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला लाभदाय ठरणार आहे. विशेष म्हणजे या द्रुतगती महामार्गावर पाच ठिकाणी विमाने उतरतील अशी आम्ही सोय करणार आहोत. त्यामुळे विमानतळ म्हणूनही या ठिकाणांचा वापर करता येईल,’ असे स्पष्ट केले.