तासगाव : पुढारी वृत्तसेवा
विट्याहून मिरजेकडे कत्तलीसाठी घेऊन जाणारी गाईंची 35 जर्शी वासरे व 5 रेडके असणारी गाडी गोरक्षक डॉ. विशाल पाटील व सचिन जाधव यांनी पकडली. याप्रकरणी रमजान इसरार मनियार (वय 24) व एक अल्पवयीन (दोघे रा. मिरज) या दोघांवर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी डॉ. विशाल पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे : विश्व हिंदू परिषदेच्या नचिकेत रावळ यांनी विट्याहून मिरजकडे कत्तलीसाठी काही वासरे एका गाडीतून (एमएच 10 बीआर 0441) तून काही गो तस्करीसाठी जात असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार पाटील व जाधव यांनी विटा- तासगाव रस्त्यावर सापळा लावला होता.
लिंब गावाजवळ त्यांनी इशारा करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी गाडी थांबवली नाही. यावेळी फिर्यादी पाटील व जाधव यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून पानमळेवाडी गावाजवळ चारचाकी गाडी रस्त्यात आडवी उभी करून गाडी थांबवली. गाडी थांबतच गाडीतील दोघे पळू लागले. यावेळी पळताना पाय घसरून बेपारी हा पडल्याने जखमी झाला. त्या दोघांना पकडून पोलिसांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात दिले. या वेळी गाडीतील वासरे व रेडकांना क्रूरतेने त्यांची तोंडे बांधून ठेवली असल्याचे दिसून आले.
सर्वच वासरे व रेडके याची पशुवैद्यकीय विभागामार्फत तपासणी करण्यात आली. वासरे व रेडकांना गो शाळेत दाखल करण्यात आले. संशयित दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांवर दि.22 जून रोजी 104 वाहनांची कत्तलीसाठी वाहतूक केल्याचा विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.