आमसिद्ध व्हनकोरे
सोलापूर : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून तांडा वस्ती विकासासाठी ८९४ कामे शासनाकडे प्रस्तावित आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव गेल्या आठ महिन्यांपासून शासनस्तरावर धुळखात पडून आहे. त्यामुळे तांड्यातील विकासकामांना मुहूर्तच लागत नाही.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तांडा वस्ती योजना राबविली जाते. तांडा व वस्त्यांना मुख्य गावांशी जोडणे व तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हाच या विभागाचा उद्देश आहे. जिल्ह्यात ४४०६ तांडा-वस्त्या आहेत. येथे विद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत सिमेंट रस्ते, गटारी, शौचालये, वाचनालये तसेच आवश्यकतेनुसार मुख्य रस्त्यांशी जोडणे अशी कामे केली जातात. यापूर्वी फक्त बंजारा समाजाच्या वस्त्यांमध्ये ही कामे केली जाते.
यंदापासून विमुक्त जाती-जमातीतील व अन्य समाजांच्या वसाहतींचाही यात समावेश केला आहे. ११ तालुक्यांतून कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हा दक्षता समितीने ८९४ कामांना मंजुरी देऊन त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. पावसाळी अधिवेशनात या कामांना मंजुरी मिळेल, अशी आशा होती. मात्र अधिवेशनात या प्रस्तावावर चर्चाच झाली नाही. सहाय्यक संचालक कार्यालयाकडून यासाठी पाठपुरावा सुरू असून मंजुरी मिळाली तरच येथील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल.