पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा मुक्काम 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात आठ ते दहा दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पाऊस जोरदार ते अतिजोरदार या प्रमाणात हजेरी लावत आहे.
दरम्यान, 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्याचा काही भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस चांगलेच थैमान घालण्याची चिन्हे आहेत. सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.
शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला. शहरात दिवसभर अधूनमधून हलक्या व मध्यम सरी कोसळत होत्या. मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत राधानगरीसह १३ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून रात्री ९ वाजता पाणी पातळी ३४ फूट १० इंचांवर पोहोचली होती.
पंचगंगेची वाटचाल आता ३९ फूट या इशारा पातळीकडे सुरू आहे. जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात मंगळवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. अधूनमधून मध्यम सरी काही काळासाठी येत होत्या. दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात २३ मि.मी. पाऊस झाला.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सोमवारी रात्री ९ वाजता पाणी पातळी ३१.४ फुटांवर होती. यामध्ये साडेतीन फुटांची वाढ होऊन मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी पातळी ३४.१० फुटांवर पोहोचली होती.
शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला लागले आहे. राधानगरी धरणाचे सध्या ४, ५ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले असून सध्या धरणातून ५ हजार ७८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातूनही १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे याशिवाय पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक सुरू आहे.
यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बुधवारी (दि. २८) कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे.