अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : गेल्या १० वर्षांत कोकण पर्यटनाला 'अच्छे 'दिन' येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर आलेल्या यंदाच्या नाताळ आणि इंग्रजी नववर्ष स्वागत या निमित्ताने कोकणातील २५ सागरी किनाऱ्यांवर सुमारे पाच लाख पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दापोली, गणपतीपुळे, देवगड, मालवण, वेंगुर्ले हे समुद्रकिनारे हाऊसफुल्ल झाले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटकांच्या आकर्षणासाठी बनाना राईड, बीच पॅराशूट, वॉटरगेम, एटीव्ही व्हेईकल्स असे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू झाल्याने पर्यटन वाढू लागले आहे. त्यामुळेच नाताळ, इअर एंडिंग आणि इंग्रजी नववर्ष स्वागत या निमित्ताने कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळांवर पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक आले आहेत.
रविवारी अलिबाग, मुरुड, दिवे आगर, श्रीवर्धनसह रायगड जिल्ह्यातील जवळपास १५ सागरी किनाऱ्यावर तीन लाख पर्यटकांनी हजेरी लावली होती; तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाहायला मिळाले. दोन लाख पर्यटकांनी हजेरी लावली आहे. यापूर्वी नाताळला पर्यटकांचा ओढा गोव्याकडेच असायचा मात्र आता कोकणच्या किनारपट्टीवरही नाताळ सेलिब्रेशन सुरू झाले आहे. त्यामध्ये सांताक्लॉजची वाळू शिल्पेही कोकणच्या किनारपट्टीवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पर्यटक आकर्षित झाल्याचे पाहायला मिळाले.
नाताळ सण आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण कोकणच्या किनारपट्टीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७५ पोलिस अधिकारी, ४१२ पोलिस आणि ९० वाहतूक पोलिस तैनात करून विशेष सुरक्षा उपाययोजना अमलात आणण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व म्हणजे २८ पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून विशेष पोलिस पथके तयार करण्यात आली असून हॉटेल, ढाबे, कॉटेज, फार्म हाऊस येथे गैरकृत्य होणार नाही याकडे बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मद्य प्राशन करून गोंधळ घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस पथके नेमण्यात आली आहेत. त्याच बरोबर महिला सुरक्षेच्या दृष्टीने साध्या वेशातील महिला व पुरुष पोलिस यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिवे आगर अशी समुद्र किनारपट्टी असलेली ठिकाणे, खालापूर व कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसेस, थंड हवेचे ठिकाण माथेरान या ठिकाणी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या शहरांतून पर्यटक मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागत व पर्यटनासाठी येत असतात.