Wild Mushroom Farming Pudhari
रायगड

Wild Mushroom Farming: खाडीपट्ट्यात रानातील अळंबीला मोठी मागणी; रोजगारामुळे स्थानिकांना आर्थिक फायदा

पावसामुळे उगवण; नाक्यांनाक्यांवर अळंबी विक्रीसाठी

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: पावसाने जोर धरताच खाडीपट्ट्यातील रानात अळंबीचे पीक जोमात आले आहे. त्यामुळे खाडीपट्टयातील नाक्यानाक्यावर सध्या रानातील आळंबीला मोठी मागणी आहे आणि शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

खाडीपट्टयात गेली कित्येक दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भात लावणीची कामे जोरदार सुरु आहेत, तर दुसरीकडे रानात डोंगरमाथ्यावर, झाडाझुडपातून मोठ्या प्रमाणात अळंबीची उगवण झालेली पाहायला मिळत आहे.

आदिवासी तसेच स्थानिक नागरिक अळंबीचा शोध घेऊन त्यांच्या विक्रीतून रोजगाराचा मार्ग शोधत आहेत त्यामुळे त्यातून आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

गेल्या २ आठवड्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे जंगलात आणि बांधावर रान अळंबी मोठ्या प्रमाणात उगवली आहे. मुंबई, पुणे, रायगडच्या बाजारात ताजी रान आळंबीला ४०० ते ५०० रुपये किलो पर्यंत भाव मिळत आहे.

आदिवासी आणि शेतकरी कुटुंबांना यातून चांगला रोजगार आणि १५ ते २० हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. रानातील आळंबी ही नैसर्गिक असल्याने तिची चव आणि औषधी गुणांमुळे हॉटेल्स आणि घरगुती खरेदीदार दोघेही आवडीने घेत आहेत. पाऊस असाच राहिला तर अजून १ महिना हा हंगाम राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नैसर्गिक उत्पादित होणाऱ्या अळंबी व रानभाज्या या चविष्ट आणि स्वादिष्ट असल्याने पावसाळ्यात महाडच्या खाडीपट्टयातील गावागावांतून चवीने त्याचा आस्वाद घेतला जात आहे. मोठा पाऊस झाला की, रानात अळंबी जमिनीतून वर उगवते.

ती शोधून काढणे कसबीचे काम असले तरी गेली पंधरा दिवसांपासून मोठया प्रमाणात अळंबी उगवण झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. खाडीपट्टयातील रोजगाराच्यानिमित्ताने आदिवासी समाजातील अनेक कुटुंबे गाव सोडून इतर ठिकाणी झोपड्या बांधून राहत आहेत.

पहाटे लवकर जंगलात जाऊन अळंबीचा शोध घेण्यात येतो. गवत वाढल्याने त्यातून अळंबीच्या कळ्या शोधून काढाव्या लागत आहेत, मात्र माहितगार बरोबर शोधत त्या काढून घेत आहेत. स्थानिक शेतकरीही या कामी पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन तासांत टोपलीभर अळंबी जमा करुन त्याची चविस्ट भाजी करण्यासाठी, तर काही बांधव अळंबी जमा करून त्याची मुख्य रस्त्याशेजारी अथवा गावोगावो विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. १०० ते २०० रुपयांना वाटा लावून आदिवासी महिला त्याची विक्री करताना पाहायला मिळत आहेत.

नागरिकांची खरेदीसाठी गर्दी

खाडीपट्टा परिसरात अळंबीची विक्री होत असून, खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तास दोन तासातच आणलेली अळंबी विक्री होऊन त्यातून हजार ते दीड हजार रुपयांचे उत्पन्न पदरी पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रानात उगवणाऱ्या नैसर्गिक भाज्यांना चांगली मागणी असून, नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT