जंगली प्राण्यांचा भात व कडधान्यांच्या शेतात धुडगूस pudhari photo
रायगड

Wild animals damage crops : जंगली प्राण्यांचा भात व कडधान्यांच्या शेतात धुडगूस

माणगावातील शेतकरी पुन्हा संकटात अन्नदात्याचे दुःख संपता संपेना

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दु:ख संपता संपत नाही. यंदा मे ते नोव्हेंबरदरम्यानच्या सलग अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले.

अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन भातखाचरे पाण्याखाली गेली, तर कडधान्यांची पेरणी उशिरा करावी लागली. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्यानंतरही न डगमगता शेतकऱ्यांनी नव्याने उभारी घेत भातासह वाल, पावटा, मुग, मटकी, हरभरा यांसारख्या कडधान्यांची तसेच चवळी, गवार, भेंडी, वांगी, टोमॅटो, मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर आदी भाजीपाल्याची लागवड केली. मात्र आता जंगली प्राणी आणि मोकाट जनावरांच्या धुडगूसामुळे ही पिकेही धोक्यात आली आहेत.

वनविभाग व प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी-या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पाहणी करून जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशीही अपेक्षा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करून भरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनेअंतर्गत मदत जलदगतीने वितरित करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

अन्नसुरक्षेचा प्रश्न :

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात समाजाच्या अन्नसुरक्षेची हमी दडलेली आहे. जर पिकांचे असेच नुकसान होत राहिले, तर केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शासन आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून या अन्नदात्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यातील शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असून, ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना हाच त्यांच्या जगण्याचा आधार ठरणार आहे.

रात्रीचा जागता पहारा, तरीही पिकांची नासधूस

तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात रानटी डुक्कर, जंगली श्वापदे व मोकाट गुरांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्रीच्या अंधारात कळपाच्या कळप शेतात घुसून भाताच्या रोपांपासून ते कडधान्यांच्या वेलींवर तुडवाट करत आहेत. काही ठिकाणी संपूर्ण शेत उकरून टाकल्याने पुन्हा पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी जीवावर उदार होऊन हातात काठी, टॉर्च घेऊन रात्रभर शेतातच पहारा देत आहेत. मात्र प्राण्यांच्या कळपांसमोर त्यांची शक्ती तोकडी पडत आहे. “सकाळी उठून शेतात गेल्यावर सर्व काही उद्ध्वस्त झालेलं दिसतं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो,” अशी हळहळ अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.

तिहेरी संकटात अन्नदाता

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप अनेकांना मिळालेली नाही. त्यातच बियाणे, खते, औषधे व मजुरीचे वाढते दर यामुळे उत्पादन खर्च गगनाला भिडला आहे. कर्जाचा डोंगर, उत्पन्नाची अनिश्चितता आणि आता जंगली प्राण्यांचा वाढता उपद्रव या तिहेरी संकटाने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या शेताभोवती तात्पुरते कुंपण उभारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही. विजेवर चालणारे सौर कुंपण, सापळे किंवा वनविभागाची मदत यांची तीव्र गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT