जेएनपीटी बंदराबाहेर कंटेनरवाहू ट्रक्सच्या रांगा लागल्या आहेत (छाया-राजकुमार भगत)  
रायगड

US - Iran War | युद्धाचा फटका, जेएनपीए बंदरात अडकले 1200 कंटेनर्स, सुमारे 300 कोटींचा निर्यात होणारा माल रखडला

युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम, नाशवंत माल खराब होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

रायगडः इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील धोका वाढल्याने मालवाहू जहाजांचे मार्ग बदलले आहेत. आखाती देशांमधील या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून कोट्यवधी रुपयांचा माल जेएनपीए बंदरात अडकला आहे. जेएनपीए बंदरात अडकलेल्या सुमारे 1200 कंटेनरमधील मालाची एकूण किंमत 250कोटी ते 300 कोटींच्या आसपास असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

300 कंटेनरमधील नाशवंत माल खराब होण्याची भीती

जेएनपीए बंदरात रखडलेल्या या कंटेनर्समध्ये नाशवंत माल असून त्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  जेएनपीए बंदराच्या सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या कंटेनर्समध्ये कांदा, द्राक्षे आणि केळी  या शेतीमालाचा समावेश आहे. केवळ 300 कंटेनरमधील नाशवंत मालाची किंमत 60 ते 70 कोटी रुपये आहे. हा माल वेळेत पोहोचला नाही तर तो खराब होऊन संपूर्ण तोटा सहन करावा लागेल भीती व्यक्त केली जात आहे.

आयात-निर्यातीवर थेट 60 टक्के परिणाम

जेएनपीए बंदरातून होणाऱ्या कृषी मालाच्या आयात-निर्यातीवर थेट 60 टक्के परिणाम झाला आहे. युद्धाच्या अस्थिर परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांकडे जाण्यास नकार दिल्याने नवीन बुकिंग सद्यस्थितीत पूर्णपणे थांबले आहे, त्यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांच्या परकीय चलनावर त्यांचा परिणाम होत असल्याचे शिपींग क्षेत्रातील माहितीगारांनी सांगीतले आहे.

कंटेनर रेफ्रिजरेटेड यंत्रणा थांबल्याल नुकसान वाढणार

मालवाहू जहाजाने निर्यात होणाऱ्या अनेक कंटेनरमध्ये रेफ्रिजरेटेड यंत्रणा असते. जर हे कंटेनर जास्त काळ बंदरात उभे राहिले आणि त्यांना प्लग पॉइंट्स (वीज पुरवठा) मिळाला नाही, तर आतील माल पूर्णपणे सडून जाऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

शिपिंग कंपन्यांचा जहाजे पाठवण्यास वा स्वीकारण्यास नकार

आखाती देशांतील युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे आणि शिपिंग कंपन्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे जेएनपीए बंदरावर त्यांचा मोठा परिणाम झाला आहे.सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी आपली जहाजे पाठवण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्यामुळे जहाजांच्या येण्या-जाण्याच्या वेळापत्रकात मोठा विस्कळीतपणा आला आहे.

क्रूड तेल, एलपीजीच्या आयातीवर परिणाम

आखाती देशांमधील विशेषतः इराण-इस्रायल तणावामुळे भारताच्या क्रूड तेलाच्या (कच्चे तेल) आयातीवर परिणाम झाला आहे. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी सुमारे 50टक्के तेल आणि 80टक्के एलपीजी  इराणजवळील होर्मुझ सामुद्रधुनी  या अरुंद मार्गातून येते. या मार्गावर युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे तेलाच्या जहाजांची ये-जा धोक्यात आली आहे. सौदी अरेबिया, इराक आणि यूएई  हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार देश आहेत. या देशांकडून येणाऱ्या जहाजांना आता अधिक सुरक्षा आणि विम्याच्या  वाढीव खर्चामुळे विलंब होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT