नेरळ: कर्जत तालुक्यातील आंजप गाव परिसरातील पेज नदीत बुडून दोन विवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अजय भास्कर म्हसे (वय 33, रा. वारे, ता. कर्जत) आणि सुनील महेंद्र प्रजापती (वय 35, रा. चाफेकर नगर, शिवाजीनगर, पुणे) अशी दोघां मृतांची नावे आहेत.
मृत्यूमुखी पडलेले दोघेही जिवलग मित्र असून, आपल्या पत्नी व मुलांसोबत सहकुटूंब सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, या आनंदाच्या क्षणावर अचानक काळाने घाला घातला.
पाणी सोडण्यापूर्वी ना धोक्याची सूचना ना सायरन अलर्ट
टाटा पॉवर हाऊसकडून सकाळी आणि संध्याकाळी पेज नदिता पाणी सोडण्यात येते. मात्र पाणी सोडताना कोणत्याही प्रकारची सूचना वा अलर्ट सायरन वाजवण्यात येत नाही. स्थानिकांना पाणी सोडण्यात येते या बाबत माहिती आहे, मात्र बाहेरुन आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसल्याने नदित अचानक पाणी वाढल्याने त्याचा अंदाज आला नाही आणि दोघांचा बुडून मृत्यू झाला.