रायगड : ऑनलाइन डेस्क - रायगड किल्ल्यावर ढगफुटी झाल्याने रविवार (दि.७) रोजी रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले होते. याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी गावातील मनोज खोपकर हा तरुण टकमक टोकाच्या खाली आपल्या मित्रांसह कोसळणाऱ्या धबधब्या मध्ये आंघोळी करण्यास गेला होता. त्यादरम्यान तो वाहून गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून एन. डी. आर. एफची टीम, आपदामित्र, सिस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत रायगड पासून ते बाणकोट खाडी पर्यंत मनोज खोपकर याची शोध मोहीम सुरू होती. तर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नाने अखेर वाघेरी गाव हद्दीतील काळ नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह बुधवारी (दि.१०) रोजी संध्याकाळी सापडल्याने ही शोध मोहीम आता थांबली आहे.
रायगडमध्ये रविवारी (दि. ११) झालेल्या ढगफुटीमुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झाली होती. यावेळी किल्ले रायगडावर आलेले काही पर्यटक पायरीमार्गाने उतरत असताना वरून अचानक पाण्याचा लोंढा आल्याने पर्यटक काही काळ अडकून पडले होते. अशातच रायगडवाडी गावातील मनोज खोपकर हा तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरलेला असतांना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला होता. त्याचा पोलिस एनडीआरएफसह इतर बचाव दलाकडून शोध सुरू होता.