रायगड: "चाफा बोलेना, चाफा चालेना..." या ओळींतून मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणारा सोनचाफा आता केवळ गाण्यापुरता मर्यादित राहिला नसून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी आणि फुलविक्रेत्यांसाठी मोठ्या आर्थिक उलाढालीचे साधन बनला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दररोज लाखो रुपयांच्या सोनचाफ्याची आवक-जावक होत असून, स्थानिक बाजारपेठेसह मुंबई-पुण्याच्या बाजारात या फुलाला मोठी मागणी आहे.
कोकणातून दररोज मुंबईतील दादर, कल्याण आणि पुण्याच्या फुल बाजारात हजारो शेकडा (प्रति १०० फुले) सोनचाफा पाठवला जातो. सण-उत्सव, लग्नसराई आणि श्रावण महिन्यात या फुलांची विक्री गगनाला भिडते.
नेहमीच्या दिवसांत एका फुलाला ३ ते ५ रुपये मिळतात, तर श्रावण, गणेशोत्सव आणि नवरात्रीत एका फुलाचा दर ८ ते १५ रुपयांपर्यंत पोहोचतो. एका पूर्ण वाढलेल्या झाडापासून दररोज ५० ते २०० फुले मिळतात.
एकट्या रायगड जिल्ह्यातून स्थानिक विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून महिन्याला सुमारे ५लाख रुपयांची उलाढाल होते.
अत्तर व कॉस्मॅटिक्स उद्योग
सोनचाफ्याचा तीव्र आणि टिकाऊ सुगंध अत्तर निर्मिती (Perfume Industry) तसेच सुगंधी तेले आणि कॉस्मॅटिक्स तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या उद्योगांकडून फुलांना थेट बागांमधून मोठी मागणी असते. मंदिर संस्थाने, धार्मिक विधी, तसेच महिलांच्या वेणी-गजऱ्यासाठी सोनचाफा वर्षभर विकला जातो. सोनचाफ्याचे झाड एकदा लावले की ते अनेक वर्षे उत्पादन देते. इतर पिकांच्या तुलनेत याला कीड लागण्याचे प्रमाण कमी असते आणि देखभाल खर्चही अल्प असतो.