खोपोली: खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवाशांना सहा दिवस पाणीच न आल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने प्रचंड संताप आहे.
निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतायेत असा सवाल संतप्त महिलांकडून उपस्थित केला जात असून रखडलेल्या पाणी योजनेमुळे भविष्यात पाण्यासाठी अशीच वणवण करण्याची वेळ साजगाव परिसरातील ग्रामस्थांवर येण्याची शक्यता आहे.अशी चर्चा सुरू झाली आहे.
खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत साजगाव, ढेकू आणि सारसन या तीन गावांचा समावेश आहे. सहा दिवसांपुर्वी तीनही गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा पंप नादुरुस्त झाला. सध्या जुनचा शेवटचा आठवडा सुरू असून पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली असून गेली काही दिवस पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता.
त्यातचं सहा दिवसांपासून पाणीचं न आल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. तीनही गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना नादुरुस्त असलेला पंप दुरूस्त करण्याचा प्रयत्न करण्याखेरीज ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आहे.
पाण्यामुळे आपल्याच लोकांचे प्रचंड हाल होत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा याचे भानही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला नसल्याने अनेक लोकांनी खासगी टँकर मागवून पाणी टंचाईवर तात्पुरता उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
सगळ्यांनाच खासगी टँकर मागवणे शक्य नसल्याने काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत असून सरपंच विनोद खवळे, उपसरपंच अजित देशमुख, ग्रामसेवक स्नेहल घोसाळकर आणि निवडून दिलेल्या सदस्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्या रेश्मा पाटील ढेकूमध्ये तर पंचायत समितीच्या सदस्या देवयानी देशमुख साजगावमध्ये राहतात तरीही ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना सहा दिवस पाण्यावाचून काढावे लागले आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून विशेष महिला कडून उमटत आहे
राष्ट्रीय पेय जल योजनेतून सुरू असलेल्या सुमारे ४ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम चार वर्ष रखडली आहे ती पूर्ण होणार कधी असा सवाल महिला वर्गातून उपस्थित होत आहे.
नागरिकांवर टँकर मागविण्याची वेळ
पाण्यामुळे आपल्याच लोकांचे प्रचंड हाल होत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा याचे भानही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला नसल्याने अनेक लोकांनी खासगी टँकर मागवून पाणी टंचाईवर तात्पुरता उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांनाच खासगी टँकर मागवणे शक्य नसल्याने काय करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.